
पाकिस्तानमधील २७ वर्षीय सर्वसाधारण गृहिणी हैदर आपली ४ मुले व पतीसमवेत कराची शहरात रहात होत्या. २०२० मध्ये करोना काळात ऑनलाईन पबजी गेम खेळताना त्यांची ओळख भारतातील २२ वर्षीय सचिन या तरुणाशी झाली. गेम खेळतानाच बोलणे होऊ लागले. आणि पुढे बोलण्याचे रुपांतर प्रेमात झाले. प्रेमाला कशाचेही बंधन नसते या उक्तीप्रमाणे मे महिन्यात ही पाकिस्तानी महिला कराचीहून तिच्या ४ मुलांना घेऊन सचिनकडे निघाली ती आधी विमानाने दुबई आणि तेथुन काठमांडूला पोहोचली. काठमांडूतून पोखरा येथे जात बसने बेकायदेशीरपणे भारतीय सीमा ओलांडण्यात यशस्वी झाली.
आश्चर्याची बाब म्हणजे, चार मुलांसह तीन देश ओलांडून आलेल्या या महिलेवर कोणलाही संशय आला नाही. पुढे दिल्ली गाठत तीने ग्रेटर नोएडातील राबुपुरा इथे वास्तव्यास असलेल्या सचिनच्या घरी प्रवेश केला. ते लग्न करणार होते इतक्यातच एका वकिलाने हैदरबद्दल पोलिसांना माहिती दिली. या जोडप्याला रविवारी पकडण्यात आले.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या हैदरने मे महिन्याच्या तिसर्या आठवड्यात भारतात प्रवेश केला होता. एक महिन्यापेक्षा जास्त काळ ती सचिनसोबत राहिली आणि त्याच्या घराजवळ स्थानिक वकिलाशी संपर्क साधला. त्याच वकिलाने याची माहिती पोलिसांना दिली.
“ती आणि तिची मुले (तीन मुली आणि एक मुलगा) पाकिस्तानी पासपोर्ट घेऊन आल्याचे मला दिसले तेव्हा मला धक्का बसला. ती भारतात लग्न करण्याच्या प्रोसेसबद्दल चौकशी करत होती. तिने सांगितले की तिला सचिनशी लग्न करायचं आहे,” अशी माहिती वकिलाने सोमवारी TOI ला दिली.
गेल्या शुक्रवारी हैदर वकिलाला भेटली होती. पण त्याने तिला तिच्या भारतीय व्हिसाबद्दल विचारताच ती निघून गेली. “माझा एक सहकारी त्यांचा पाठलाग करत होता. जेव्हा मला कळलं की ते रबुपुरा येथील एका घरात राहतात, तेंव्हा मी पोलिसांना कळवले,” असं पुढे वकिलाने सांगितले.
वकील आणि पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हैदरने दावा केला की ती पाकिस्तानमध्ये घरगुती अत्याचाराला बळी पडली आहे. “तिने सांगितले की, सौदी अरेबियात काम करणाऱ्या एका पाकिस्तानी माणसाशी तिचं लग्न झालं आणि तो तिला प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी मारहाण करायचा. ती म्हणाली की, ती चार वर्षांपासून त्याला भेटली नाही. तर तिचा भाऊ पाकिस्तानी सैन्यात असल्याची माहितीही तिने वकीलाला दिली.
अतिरिक्त सीपी (कायदा व सुव्यवस्था) सुरेशराव अरविंद कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदर आणि सचिन यांना रविवारी हरियाणाच्या वल्लभगढला जाणाऱ्या बसमधून ताब्यात घेण्यात आलं आणि चौकशीसाठी नोएडा इथे आणण्यात आले. “चौकशीदरम्यान, तिने सांगितले की तिने सिंध प्रांतातील खैरपूर येथील तिच्या आई-वडिलांचे घर १२ लाख रुपयांना विकले जेणेकरून ती सचिनशी लग्न करू शकेल.”
हैदर आणि मुलांनी नेपाळच्या व्हिसावर पाकिस्तानमधून प्रवास केला होता आणि प्रथम नेपाळमध्ये आणि नंतर भारतात बस बदलत राहिले. एकाने त्यांना यमुना एक्सप्रेसवेवर सोडले, जिथे सचिन तिची वाट पाहत होता. नेपाळमधून भारतात जात असताना, तिने पोलीस आणि इतर सुरक्षा कर्मचार्यांना ती हिंदू असल्याचे सांगितले आणि तिचे पहिले नाव सीमा असा उल्लेख केला. तिच्यासोबत चार मुले असल्याने सीमेवरील पोलिसांनी अधिक लक्ष दिले नाही, असंही तिने पोलिसांना सांगितले.
पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सचिनने त्याचे कुटुंब राहत असलेल्या घरापासून वेगळे घर भाड्याने घेतले होते आणि हैदरची त्याची पत्नी म्हणून घरमालकाशी ओळख करून दिली होती. शुक्रवारी वकिलाने पोलीसांना या प्रकरणाबाबत सांगितल्यानंतर सचिनचे फोन लोकेशन मथुरेला ट्रेस झाले. पोलिसांचा पाठलाग करताना यूपी एटीएस (दहशतवादविरोधी पथक) सोबत होते. अखेर रविवारी त्यांना हरियाणातील वल्लभगडला लग्न करण्यासाठी जात असताना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती पोलिसांनी पाकिस्तानी दूतावासाला दिली आहेच शिवाय केंद्रीय गुप्तचर यंत्रणा याप्रकरणी तपास करत आहेत.