marathistatus.co

छावा नंतर औरंगजेबच्या अंतापर्यत काय घडलं ? कोण होती रणरागिणी ताराराणी ? याचे उत्तर मिळेल या नाटकात

शिवरायांचा छावा गेला….

मग मराठी साम्राज्याचं काय झाल ?

औरंगजेब मेला तेव्हा काय परिस्थिती होती ?

त्या मधल्या काळात काय काय घटनाक्रम घडलेत ?

स्वराज्याच्या लढाईत कुणी साथ दिली ?

कुणावर गद्दारीचा ठपका ठेवल्या गेला ?

कोण स्वराज्याच्या लढाईत शहीद झाला ?

कुणी स्वराज्याची धुरा सांभाळली ?

कोण होती ताराराणी ?

आणि तिला रणरागिणी का म्हणायचे ?

अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे मनात का येवू नये ?

हा योगायोग तर नक्कीच नाही

       सध्या मोठ्या पडद्यावर “छावा” चित्रपट महाराष्ट्राच्या नाही तर अख्या हिंदुस्थानातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवत असताना शिवछत्रपतींचा छावा गेल्यानंतर इतिहासात काय घडले ? संभाजीराजांवर अतिशय निर्दयीपणे, निष्ठुरपणे छळ करून जीव घेणाऱ्या त्या औरंगजेब चे काय झाले ? संभाजी राजानंतर धुरा कुणी सांभाळली ? येसूबाई, राजे राजाराम, ताराराणी आणि इतरही महत्वाच्या व्यक्तीची स्वराज्याच्या लढाईत काय भूमिका होती ? २७ वर्षाचा स्वातंत्र्य लढा कसा होता ? हे दाखवणाऱ्या नाटकाने याच काळात मराठी रंगभूमीवर पदार्पण केले. हा केवळ योगायोग तर नक्कीच नसावा, कदाचित छत्रपती संभाजी राजानंतर पुढील इतिहास महाराष्ट्राच्या लहान मोठ्यांच्या सर्वांच्या नजरेत यावा याकरिता श्री ने केलेली ही तडजोड असावी. असेच म्हणावे लागेल.

      मराठ्यांचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या अलौकिक व्यक्तिमत्व, कामगिरी, स्वराज्याची कल्पना ते प्रत्यक्ष कृती, गनिमी कावा, पराक्रम, जय, पराजय, तह, आहुती, बलिदान, स्वराज्याची घोडदौड यापुरता मर्यादित आपण सामान्य जनतेला ज्ञात आहे. आणि तेसुद्धा पूर्णपणे तर नाहीच, शालेय शिक्षणामध्ये सुद्धा मर्यादीतच तो शिकवला जातो. तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या नंतर काय घडलं हे फारच कमी प्रमाणात जनसामान्यांना माहिती आहे.

धाडसाला सलाम

      आणि तो इतिहास माहिती व्हावा याकरिता ब्रिगेडियर सुधीरजी सावंत यांच्या संकल्पनेतून, चंद्रकांत (अण्णा) सावंत यांच्या मार्गदर्शनातून जवळपास ५० कलाकार, संगीत, प्रकाश, नेपथ्य, Back Stage तंत्रज्ञ यांच्या मेहनतीने एक अप्रतिम भव्य ऐतिहासिक नाट्यकृती निर्माण झाली ती म्हणजे “रणरागिणी ताराराणी” लेखक युवराज पाटील यांनी उत्तम लेखन केले असून दिग्दर्शक विजय राणे यांनी अतिशय सुंदर दिग्दर्शन केले आहे. आणि कलाकारांचे काम हे तुम्हाला इतिहासात नक्कीच घेवून जातील. रक्त सळसळनं कशाला म्हणतात ? अंगावर काटा उभा राहाण कशाला म्हणतात ? एखाद्या इतिहासातील पात्रावर प्रेम करणे, त्याचा अभिमान वाटणे कशाला म्हणतात ? औरंगजेब सारख्या पात्राचा तिरस्कार वाटणे कशाला म्हणतात ? हे सर्व अनुभवायचे असेल तर नक्कीच तुम्ही प्रत्येकाने हे नाटक नाट्यगृहात जावून बघावेच. आणि हि सुंदर नाट्यकृती प्रेक्षकांसाठी सादर करण्याकरिता घेतलेला धाडसी निर्णय ज्यांनी घेतला, आणि या निर्णयाला पूर्णत्वास नेण्याकरिता निर्मंता म्हणून, दिग्दर्शक म्हणून, कलाकार म्हणून, तंत्रज्ञ म्हणून ज्यांनी ज्यांनी हातभार लावला या सर्वंच्या धाडसाला, कर्तुत्वाला सलाम…

नाटक का बघावं

      नाटकची सुरुवात तिथून होते जिथे संभाजी महाराजांचा छळ होतोय, पण स्वराज्यासाठी झटणारा आमचा वाघ तटस्थपणे उभा राहतो. आणि त्या औरंगजेबाची महाराजांच्या डोळ्यात डोळे टाकून बोलण्याच हिम्मत होत नाही… केवळ अप्रतिम….. मी अजून व्यस्ततेमुळे छावा चित्रपट बघितला नाही पण नक्कीच त्या चित्रपटाचा अंत संभाजी महाराज स्वाभिमान राखून न झुकता जग सोडून गेले यानेच होत असावी… तिथूनच हे नाटक सुरु होतं. आणि पुढील घडामोडी अप्रतिम रित्या सादर करण्याचा प्रयत्न लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांनी केला आहे. प्रयत्न म्हणण्यापेक्षा यशस्वीपणे ते सादर केले आहे असे म्हणावे लागेल…

      कलाकारांच्या साथीला उत्तम संगीत, उत्तम प्रकाश योजना तर आहेच पण इतिहासाला जिवंत करण्याकरिता प्रसाद ओक सर यांच्या आवाजाने साथ दिली आहे. ती सुद्धा आपल्याला इतिहासाची फेरी मारून आणते, घटनाक्रम पुढे नेण्याकरिता, समजून घेण्याकरिता त्यांच्या आवाजाची मदत होते, नेपथ्य खूपच सुंदर आहे, त्यापेक्षा त्यामागील मेहनत हि खूप मोठ्या प्रमाणातली आहे हे एक प्रेक्षक म्हणून जाणवते. येवढ्या लवकर आणि येवढ्या कमी वेळात कित्येकदा सेट चेंज करणे हे काही सोपी गोष्ट नाही. ती सुद्धा जबाबदारी पडद्यामागील कलाकारांनी लीलया पेलली आहे. त्यांचे पण आभार मानावे तितके कमीच. विशेष म्हणजे या नाटकात युद्धाचे प्रसंग दाखवलेले आहेत तेही खऱ्या तलवारी वापरून. युद्धाच्या वेळी तलवारींचा आवाज प्रेक्षकांच्या कानात जात होता आणि इकडे आमच्या मनाची घालमेल होत होती. सर्व कलाकारांनी अतिशय सुंदर काम केलेले आहे. सर्वाची मेहनत आपल्याला इतिहासाचा एक सुंदर अनुभव देवून जाते.

प्रयोगाच्या तिकीट बुक करण्याकरिता – क्लिक करा 

      आचार्य अत्रे नाट्यगृह कल्याणच्या प्रयोगाविषयी विशेष –

      श्री सुनील गोडसे सर जे या नाटकात औरंगजेब ची भूमिका साकारत आहेत त्यांची काल एका दुसऱ्या निमित्ताने भेट झाली. आणि त्यांना ठरल्या वेळेपेक्षा आधी जावे लागले. त्यामागील कारण विचारले असता या नाटकात ताराराणी ची भूमिका बजावणाऱ्या नायिकेच्च्या पायाला गंभीर दुखापत झालेली आहे, आणि उद्याच प्रयोग आहे म्हणून लवकर जावे लागेल असे सांगितले. आणि आज आकाश भोसले या मित्राच्या पुढाकाराने मी आणि आकाश दोघेही आमच्या अरसिक पत्नींना घेवून प्रयोगाला पोहचलो. आणि प्रयोगाच्या अगोदर मेक अप रूम मध्ये कलाकारांना भेटायला गेल्यानंतर ताराराणीची भूमिका साकारणाऱ्या हिरोईन आल्यात… आल्यात नाही तर दोन तीन व्यक्तींनी आधार देत, एका पायावर त्यांना आणलं. हे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं.

      आणि प्रयोग सुरु झाला… त्यागोदर दिग्दर्शकांनी सूचना वजा विनंती केली कि मुख्य नायिकेच्या पायाला दुखापत झालेली आहे म्हणून त्या पायाला सपोर्ट म्हणून लेग सपोर्टर कीट लावून प्रयोग सादर होणार आहे. आणि ऐतिहासिक नाटक असल्यामुळे त्या काळाशी ते सामंजस्य नाही वाटणार पण पर्याय नाही, प्रेक्षकांनी सांभाळून घ्या. ताराराणी ची भूमिका करणाऱ्या ताईची अवस्था स्टेजच्या मागे बघितलेली होती. पायाला किती वेदना होत असतील याची कल्पना आम्हाला होतीच. पण जेव्हा जेव्हा त्यांनी रंगमचावर प्रवेश केला, आणि वीर ताराराणीची भूमिका वठवली तर त्या पायाच्या दुखापातीच्या दुःखाचा लवलेशही त्यांच्या चेहऱ्यावर दिसला नाही. पण अंधार जरी असला तरी आम्ही चौथ्या रांगेत असल्यामुळे त्यांच्या प्रेवेशाला त्यांना दोन तीन व्यक्ती विंगेतून आधार देवून रंगमचावर आणत होते, आणि Black Out ला लगेच स्टेज वर येऊन त्यांना घेवून जात होते हे आम्हाला दिसत होत. रंगमंचावरचं, कालेवरचे काय भयंकर प्रेम आहे ? Salute… कदाचित पायाला येवढा त्अरास होत असताना सुद्धा वीर रणरागिणी ताराराणी ची भूमिका पार पाडायला खुद्द ताराराणीच्या व्यक्तिमत्वानेच त्यांना ताकद दिली असावी.

      पूर्ण नाटका मध्ये फक्त स्टेप घेताना पायाची हालचाल थोडी त्रासदायक दिसत होती. पण चेहऱ्यावर वीरता, स्वराज्यावरचं प्रेम, कठोर निर्णय घेतानाचा आवेश कुठेही कमी दिसू दिला नाही. या करिता खरच त्यांना मानावं लागेल.

      आम्ही जवळ असल्याकारणाने स्टेज वरची एक एक हालचाल आम्हाला जवळून दिसत होती. दुसऱ्या अंकामध्ये माझ्या सौ. ने कानात सांगितले कि पहिल्या अंकापेक्षा आता दुसऱ्या अंकात तारा राणी ची भूमिका वठवणाऱ्या नायिकेचा पाय सुजलेला आहे. काय त्या वेदना असाव्यात… पण त्या जाणवू न देता Show Must Go On म्हणून रंगमंचावर वावरणाऱ्या ताईला लाख लाख सलाम. एकंदरीत सर्व कलाकारांचे काम हे दमदारच होते. त्यात साकारलेला औरंगजेब सुनील गोडसे सरांनी सुंदर साकारला आहे. प्रेक्षकांच्या अगदी मनापासून शिव्या निघत होत्याच तर काही ठिकाणी त्याच्यावर, त्या औरंगजेबाच्या मर्यादेवर तुच्छतेने हसूही येत होतं. हे हि एक प्रकारचे यशच म्हणावे लागेल. सर्व कलाकारांचे काम अप्रतिमच होते. त्याने तुम्हाला इतिहासातला काळ अनुभवायला मिळतोच.

      असं एकंदरीत सुंदर, इतिहासात घेवून जाणारं, बऱ्याच गोष्टींची उकल करणारं हे नाटक प्रत्येक गावात, तालुक्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत पोहचावं असं ब्रिगेडियर सावंत सर म्हणाले, आणि खरच हे नाटक प्रत्येकांनी बघावं, मोठ्यांनी तर बघावच पण लहान मुलांनी, युवकांनी हे नाटक आवर्जून बघायला हव.

या नाटकाच्या फोटो Whats App स्टेटस ला ठेवल्या ठेवल्या माझ्या नागपूर च्या एका वकील मित्राचा MSG आला कि हे नाटक आपल्या तालुक्याच्या ठिकाणी करता येईल का ? हे त्यांना वाटावं यातच यश आहे. नक्कीच लवकरच महाराष्ट्राच्या गावागावात हे नाटक पोहचावं हि श्री चरणी प्रार्थना…

 

डॉ. प्रदिप सदाशिव निंदेकर

936030860

 

       

 

 

Tranding बातम्या

No posts found.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *