marathistatus.co

रविंद्र प्रभूदेसाई – यशोगाथा – उद्योग जगतात तीन दशकं एक मराठी नाव आहे टिकून

सध्या दिवाळी सुरू आहे, आज लक्ष्मीपूजनाचा दिवस. एव्हाना प्रत्येक घरात आज सायंकाळच्या लक्ष्मीपूजनाची लगबग सुरू झाली असेल. प्रांतानुसार विधी, पद्धती, चालीरीती बदलत असल्या तरी एक गोष्ट कॉमन आहे आणि ती म्हणजे कोणत्याही पूजनासाठी लागणारी तांब्या पितळेची भांडी. याशिवाय देवपूजा पूर्ण झाल्यासारखी वाटतच नाही. भांडी म्हटलं की अर्थात त्याची स्वच्छता आली आणि त्यातूनही तांब्या पितळेच्या भांड्यांचा विषय निघाला की सगळ्यांच्या तोंडी एकच नाव येत ते म्हणजे ‘पितांबरी’. होय तेच, ‘बायको गेली माहेरी, काम करी पितांबरी’. पितांबरी ज्यांनी घराघरात पोहोचवून तीन दशकं स्त्रीयांचे काम सोपे केले अशा रविंद्र प्रभूदेसाई या मराठमोळ्या उद्योजकाची ओळख आपण आपल्या ‘मराठी पाऊल’ या लेखमालिकेत करुन घेणार आहोत.

1985-86च्या काळात रविंद्र प्रभूदेसाई यांचं पदवीचं शिक्षण पूर्ण झालं. करियरच्या दृष्टीने अनुभव गाठीशी असावा म्हणून ते टाइल्सच्या फॅक्टरीमध्ये कामासाठी गेले. मात्र त्यात त्यांच मन लागेना. मग त्यांनी त्यांच्या वडिलांचे मित्र अरविंद गोरे यांच्याशी भागीदारी करत लिक्विड सोपचा व्यवसाय सुरू केला. त्याचा फॉर्म्युला बनवण्यासाठी रविंद्र यांनी ब्रिटिश कौन्सिल आणि विद्यापीठाच्या ग्रंथालयातली अनेक पुस्तकं वाचली आणि स्वतः फॉर्म्युला तयार करून कंपनीला विकत होते. लिक्विड सोपसोबतच ते तांब्याची मोठी भांडी साफ करण्यासाठी ‘कॉर्पशाइन’ नावाची पावडर विकत होते.

दरम्यान, रविंद्र यांनी डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट साठी प्रवेश घेतला. तिथे ते FMCG products फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्सबद्दल शिकले. म्हणजे दररोज घरामध्ये पहाटे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जेवढ्या वस्तू लागतात त्यांचं उत्पादन आणि विक्री. या वस्तू रोजच लागत असल्याने त्यांची मागणी खूप असते आणि लोकसंख्या वाढेल तशी ती वाढतच राहते.

त्या काळात अनेकांच्या घरात तांब्या-पितळेचे हंडे, पराती, बंब इथपासून ते देवाची भांडी होती. कंपन्यांसाठी ‘कॉर्पशाइन’ बनवतो ती घरगुती वापरासाठी केली तर काम किती सोपे होईल. मग त्यांनी लिंबू रस, टार्टरिक ॲसिड, शिकेकाई आणि डोलोमेट (दगडाची पावडर) वापरून एक पावडर तयार केली आणि घरातली तांब्या-पितळेची भांडी घासून आईला दाखवली. ती चकचकीत भांडी पाहून त्यांच्या आई तर चकित झाल्या. मग अभिप्रायासाठी त्या पावडरच्या छोट्या पुड्या बनवून त्या शेजारीपाजारी, नातेवाईक आणि मित्रमंडळींत मोफत वाटल्या. राख आणि नारळाच्या शेंडीने घासून हातांना चरे पडायचे ते आता पडले नसल्याने प्रॉडक्ट बाबत सगळे खूष झाले.

कौतुकाची आणि मार्गदर्शनाच्या अपेक्षेने कॉलेजमध्ये शिकलेलं एफ.एम.सी.जी. वापरून नवा व्यवसाय सुरू करतोय हे सांगण्यासाठी रविंद्र त्यांच्या प्रोफेसरांकडे गेले. त्यांच्या मते स्टेनलेस स्टीलची भांडी वाढत असल्यामुळे तांब्या-पितळेची भांडी पुढे कोणी वापरणार नाही हे कारण देत त्यांनी रविंद्रना वेड्यात काढलं. रविंद्र यांनी ते फारसं मनावर न घेता घरातच दररोज पावडर बनवायला सुरुवात केली. रविंद्र दिवसा पावडर बनवत आणि रात्री आई वडिल आणि दोन बहिणींसह एकत्र बसून त्याच्या पुड्या बनवत. प्रत्येक पुडी शंभर ग्रॅमची आणि त्याची विक्री किंमत दोन रुपये.

आधी वापरत असलेलं ‘कॉर्पशाइन’ हे ट्रेडनेम असल्यामुळे ते घरगुती वापराच्या उत्पादनाला चालणार नव्हतं. मग ‘पितळे’तलं ‘पित’ आणि ‘तांबं’ असं एकत्र करून ‘पितांबरी’ हा शब्द नक्की केला. पाकीटांवर तो छापून घेतला. आधी ते एकटेच घरोघरी जाऊन पाकीटं विकत असत. पुढे दोन मुलं ठेवली. त्यांना प्रत्येक पाकीटावर कमिशन ठरवलं. ती घरोघरी जाऊन विकू लागली. त्यांची ही धावपळ घराजवळचा दुकानदार पाहत होता. एके दिवशी त्याने रोजच्या दोनशे पाकीटांची ऑर्डर दिली. दुकानदाराच्या मागणीमुळे महिन्याला पाचशे पाकीटं बनवणारे रविंद्र साडेसहा हजार पाकीटं बनवू लागले. तो दुकानदार घेतलेली पाकीटं इतर दुकानदारांना कमिशनवर देत होता.

‘बायको गेली माहेरी, काम करी पितांबरी’ या टॅगलाईनला आक्षेप घेत पुण्यातल्या महिला संघटना निवेदन घेऊन रविंद्र यांच्याकडे आल्या. त्यांच्या मते त्यातून फक्त ‘बायकांनीच भांडी घासायची’ असा संदेश जात होता. हे भांडी घासणं ‘पितांबरी’मुळे सोपं होतं, इतकंच सुचवण्यासाठी जाहीरातीत भांड्यांच्या ढिगापुढे पुरुषच उभा राहून भांडी घासतो असं चित्र दिल आहे. यावर त्यांचं समाधान झालं आणि तो विषय तिथेच संपला.

दुसऱ्या घटनेत, महाराष्ट्रातली एक मुलगी लग्न करून उत्तर प्रदेशात गेली होती. तिला त्रास देण्यासाठी तिची सासू तांब्या-पितळेच्या भांड्यांचा ढीग घासण्यासाठी देत असे. तेव्हा तिला नेमकी ‘पितांबरी’ची आठवण आली. तिने माहेरी कळवून पाच पाकीटं मागवून घेतली. अर्थातच भांडी चकचकीत झाल्याने सासूसकट सगळेच चकित झाले. या मुलीकडे दैवी शक्ती आहे असे वाटून तिच्यासोबतचं घरातल्यांचं वर्तन बदललं. हा सगळा प्रकार तिने पत्र लिहून रविंद्र यांना कळवला आणि ‘पितांबरी’चे शतश: आभार मानले.

महाराष्ट्रभर विक्रीचं जाळं पक्कं झाल्यावर त्यांनी इतर राज्यांमध्ये प्रसार सुरू केला, त्यात दक्षिणेची चार राज्यं आणि गुजरातमध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळाला. सध्या ‘पितांबरी’ची वार्षिक उलाढाल एकशे पंचवीस कोटी रुपये आहे. ते दरवर्षी दोन कोटी पाकिटं विकतात. भांडी घासण्याच्या पावडरचा असा ब्रँड तयार होणं आणि त्यातूनही उद्योग जगतात तीन दशकं एक मराठी नाव टिकून राहाणं एक यशोगाथा आहे.

आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करुन नक्की कळवा.

Marathi Status

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *