marathistatus.co

बाई पण भारी देवा – भुमिका, अपेक्षा, भावना यांचं गाणित नव्याने समजवून सांगणारा एक अनुभव…

बाईपण भारी देवा… (Baipan Bhari Deva)
भुमिका, अपेक्षा, भावना यांचं गाणित नव्याने समजवून सांगणारा एक अनुभव… माझ्या नजरेतून.

मी नुकताच सौ. च्या आग्रहास्तव बघितलेला हा चित्रपट. बरेच जन हा चित्रपट स्त्री प्रधान असल्याचे बोलतात. प्रत्येकाची दृष्टी वेगळी…

पण मला हा चित्रपट फक्त स्त्रीप्रधानच नाही तर जीवन ऊत्तमरीत्या जगण्यासाठी अमुल्य तत्वज्ञान देणाराही असल्याचे वाटले. हा चित्रपट अत्यंत सुरेख पद्धतीने हसत खेळत, वेळप्रसंगी रडवत लाखमोलाचा मार्ग दाखवून गेला.

जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्ती आई, वडील, बहीण, भाऊ अश्या वेगवेगळ्या भुमिका पार पाडत असतात. आणि त्या भुमिका वठवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून त्याच्या भुमिकेनुसार, प्रसंगानुसार पुढच्याला काही संभाव्य वर्तवनुकीच्या अपेक्षा असतात. आणि त्या त्या प्रसंगाला अपेक्षित वर्तन घडल्यास / न घडल्यास प्रेम, आदर, राग, द्वेश, तिरस्कार अशा अनंत भावना मनात निर्माण होऊन संबंधीत व्यक्तीसोबतचे वर्तन कसे राहिल हे ठरत असते.

या चित्रपटात सुध्दा सहा बहिणींच्या पुर्वायुष्यात अशा काही घटना घडल्या असतात की त्या एकमेकींचा राग, तिरस्कार करत असतात.
कारण एकच….. त्या विशिष्ट प्रसंगाला अपेक्षित असलेले वर्तन न घडल्यामुळे निर्माण झालेला द्वेश…
आणि त्यानंतरही… घडलेल्या प्रसंगावीषयी, मनात असलेला राग, द्वेश याविषयी मोकळेपणाने कधीही न केलेल्या चर्चेमुळे त्या रागाचे तिरस्कारात झालेले परिवर्तन…

आपल्याही जीवनात असंच असतं. नाही का ?

👇कदाचित आपल्याकडेही ही सोय असती…👇

पुढे एका सीन मध्ये अतिशय सुंदरपणे चित्रीत केले आहे की… या सर्व भावनांना कारणीभुत ज्या घटना होत्या त्या जुन्या काळातील घटना Black & White मध्ये दाखवून त्या घटनेत फक्त आजचे कॕरेक्टर Colour मध्ये दाखवलेत…

त्या त्या प्रसंगाना अनुरुप न केलेले अपेक्षित वर्तन आजचे Colour कॕरेक्टर जुन्या घटनेतील Black & White कॕरेक्टरला करायला लावतात.

हा प्रसंग मनाला खुपच भावला…

पण… आपण भुतकाळात जाऊन असे करु शकतो का ? नाही. पण चुकीने जर भुतकाळात आपल्याकडून पुढच्याला अपेक्षित वर्तन घडले नसेल, त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असेल… आणि त्यामुळे आपल्यात अबोला, तणाव, द्वेश असेल तर आज वर्तमानात आपण त्यांच्यासमोर आपली चुक मान्य करुन भविष्यातील आपले संबंध नक्कीच सुधारु शकतो.

एखादी व्यक्ती आपला राग करत असेल तर नक्कीच एखाद्या प्रसंगाला, आपल्या भुमिकेला अनुरुप आपण त्याला अपेक्षित वर्तन केले नसेल, त्याचा शोध घेऊ, आणि झालेल्या चुकीची जबाबदारी घेऊन, मनमोकळेपणाने एकदातरी चर्चा करु, माफी मागू… जर आपली चुक नसेल तर आपल्या “त्या” वागणुकीमागील आपल्या नजरेतून कारणमिमांसा समजावू सांगू. पण एकदा तरी चर्चा नक्की करु…

जन्मभर कुणाच्यातरी मनात आपल्याविषयीच्या द्वेशाच्या वटवृक्षाला खतपाणी घालत बसण्यापेक्षा, एकदा मनमोकळेपणाणे बोलून आपल्याप्रती प्रेमाचं रोपटं तर आपण नक्कीच लावू शकतो…

यापुढेही एक गोष्ट लक्षात ठेऊ…
माझ्या कुटूंबातीला, समाजातील, मित्रपरिवारातील, कामाच्या ठिकाणातील भुमिकेनुसार विशिष्ट प्रसंगाला विशिष्ट वर्तन हे अपेक्षित असणार… फक्त विवेकबुद्धीने त्याचा शोध घेऊन, अहंपणा न बाळगता, थोडा स्वार्थ बाजूला ठेऊन, मोठेपणाचा / गर्वाचा आव न आणता, अपेक्षित वर्तन करण्याचा आपण प्रयत्न करु, जेणेकरुन आपल्याविषयी संबंधीतांच्या मनात आपल्याविषयी चांगल्या भावना निर्माण होतील…. आणि पर्यायाने आपलाही मानसिक ताण तणाव कमी होईल.

आयुष्यरुपी या रंगमंचावर बाप म्हणून, आई म्हणून, भाऊ म्हणून, बहिण म्हणून, मित्र म्हणून, या देशाचा नागरिक म्हणून, माणुस म्हणून आपआपल्या भुमिका ऊत्तमरित्या पार पाडल्या की वैयक्तिक पातळीपासून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंतच्या बऱ्याच समस्या निर्माणच होणार नाही.

बघा एकदा करुन, फरक नक्कीच पडेल.

डॉ. प्रदिप स. निंदेकर
समुपदेशक,
मनसंवाद

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *